Thursday, 23 March 2017

"डॉक्टरांचे दुखणे"

डॉक्टर हे देव असतात असं म्हटलं जातं. अर्थात असं म्हणता येईल असे सर्वच डॉक्टर नसतात आणि असं मानणारे सर्वच पेशंट सुद्धा नसतात. मला विचाराल तर डॉक्टर हे देवच आहेत. मी पाहिलेत तेवढे तरी नक्कीच. तरीही दोन्ही बाजू लक्षात घेऊ आपण. 
आजकाल 'पैसा फेको, तमाशा देखो' या उक्तीवर भक्ती करून मूठभर डॉक्टरांचे व्यवसाय सुरू आहेत. भरमसाठ शुल्क आकारुन देखील सेवा दर्जेदार नाही. व्यवसाय स्वातंत्र्य असले तरी किमान आपण जे उपद्व्याप करतो त्याचे परिणाम आपल्या व्यवसाय बंधूंना सुद्धा भोगायला लागतात याची चाड बाळगण्यास हरकत नसावी. इतक्या उच्च शिक्षणाने डोक्यात एवढा तरी प्रकाश पडायला हवा. 
तसंच सगळ्याच डॉक्टरांना वाईट चष्म्यातून पाहण्याची गरज नाही. कारण बहुतांश डॉक्टर हे चांगलेच असतात. मूठभर लोकांसाठी सर्वांना वाईट ठरवायची गरज नाही. जे डॉक्टर आपल्या दुखण्यावर इलाज करतात त्यांनाच मारहाण करून आपण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतोय हे सुद्धा न कळण्या इतपत आपल्या लोकांची बुद्धी गंजलेली आहे का? भावनांच्या आहारी जाऊन मारहाण करणं हे निषेधार्हच आहे.
संप करणे ही या दुखण्याची तात्पुरती मलमपट्टी आहे. रामबाण इलाज नव्हे. रामबाण इलाज डॉक्टरांनी नव्हे तर पेशंटनी करायचा आहे. दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका असावी. एकमेकांची गैरसोय नको. डॉक्टरांचं हे दुखणं नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे. हे दुखणं आपण बंद केलं तरच आपल्या भावी दुखण्यांवर इलाज होईल हे समाजबांधवांनी लक्षात ठेवावं. अन्यथा या अवघड अभ्यासक्रमास गुणवंत विद्यार्थी प्रवेशच घेणार नाहीत. असं झाल्यास आपल्या देशाला सुदृढ पाहणं दुरापास्तच होईल.

Sunday, 19 March 2017

कर्जमाफीचे कवित्व...

कर्जमाफीवरून सध्या राजकारण तापतंय. सगळ्यात आधी कर्जमाफीचे होणारे चांगले वाईट परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. पण कर्जमाफी म्हणजे काय हे समजून न घेता त्याचा डांगोरा पिटणं सुरु आहे. मला या राजकारणाच्या पलिकडं जायचंय. थोडं इतिहासात जाऊ. 2009 मध्ये 71000 कोटींची कर्जमाफी झाली होती. मग परत 8 वर्षातच कर्जमाफीची गरज का वाटतीय? याचा अर्थ तेव्हा अंमलबजावणी मध्ये गंभीर त्रुटी राहिल्या आहेत व गरजू शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जमाफी पोहोचली नाहीये. आता जर कर्जमाफी करायची असेल तर ती फक्त गरीब आणि अल्प-भूधारक शेतकऱ्यांसाठी व्हावी. सरसकट नको. सधन शेतकऱ्यांना नवीन गाड्या आणि फार्म हाऊस बांधण्यासाठी नको. शासकीय योजनांची पाणीपट्टी विनाकारण थकवणार्यांसाठी नको. राजकीय नेत्यांच्या बँकांसाठी तर मुळीच नको. जो खरंच अडचणीत आहे त्यालाच हा फायदा मिळावा. पिकाला हमीभाव सुद्धा मिळावा. नुसती विधानसभा बंद पाडून काहीच होणार नाही. Soil Health Card ही एक चांगली संकल्पना आणली आहे. त्याची योग्य अंमलबजावणी गरजेची आहे. तसंच शेतकऱ्यांनीही सरकारवर अवलंबून न राहता संशोधनात्मक शेतीवर भर दिला पाहिजे. लावेल ते पिकतंय म्हणून सतत तेच पीक घेऊ नये. तसंच पाटानं पाणी पाजणं बंद केलं पाहिजे. म्हणजे या राजकीय दुष्टचक्रात अडकायची गरज भासणार नाही.
एवढंच वाटतं...आपल्याला भाकरी देणारा शेतकरी हा राजकीय भाकरी भाजण्याचं साधन होऊन बसलाय हीच खरी शोकांतिका आहे. हे थांबवण्यासाठी कवित्व सोडून कृती केली पाहिजे. अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे. अशाने आपली भूक भागवणारा बळीराजाच उपाशीच मरेल.
By Sanket
आपल्या बळीराजासाठी...

Saturday, 18 March 2017

योगी आदित्य "उदय"

मोदींवर आरोप झालेले की ते पंतप्रधान झाले तर देशाचे तुकडे करतील, जातीय दंगली घडवतील, समाजात तेढ निर्माण करतील...वगैरे वगैरे. पण वस्तुस्थिती काय आहे? उलट आज देश पुढं चाललाय. विदेशात भारताची प्रतिमा उजळून निघतीय. आता कुठं गेले पोकळ आरोप करणारे, पुरस्कार वापसी करणारे? नावं ठेवणारे ठेऊ देत. तसंच योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले म्हणून ऍलर्जी होणारे अनेक असतील. योगींना सुद्धा काम करायची संधी दिली पाहिजे. ते 1998 पासून सलग निवडून येत आहेत हे विसरता काम नये. किती द्वेष करायचा एखाद्याचा. कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा असली म्हणून विकास करणार नाहीत असं काही आहे का? So called पुरोगामी सुद्धा कट्टरच असतात ना? का गुळगुळीत असतात? भूतकाळ उगाळण्यात जन्म गेलेल्यांनी जरा वर्तमान आणि भविष्य सुद्धा पहावं. उलट योगी आक्रमकपणे UP ची कायदा व सुव्यवस्था सुधारतील अशी अपेक्षा करू. बाकी मंदिर वगैरे होईलच. थोडं त्यापुढेही जाऊ. किती वर्षे भावनेचं राजकारण करायचं. धर्मावर निष्ठा (माज नव्हे) असणारा माणूस चांगलं काम करू शकतो. धर्म कोणताही असो. निष्ठा महत्वाची. ज्यांची निष्ठा पदोपदी बदलते त्यांच्यावर बोलण्यात अर्थ नाही. नेता खमका लागतो. येरागबाळ्याचे काम नव्हे ते. आक्रमक योगींना खूप शुभेच्छा. वादात न अडकता खूप चांगली कामं करावीत. शिमगा करणारे करतीलच. पण योगी UP मध्ये एका नवीन अदित्याचा उदय करतील हे मात्र नक्की.
By Sanket
खास योगींसाठी...

Saturday, 11 March 2017

Election Result Special 'नरेंद्रांचे नैपुण्य'

निवडणूक लढताना ती जातीपाती पलीकडं जाऊन लढवता येते आणि जिंकताही येते हे आज पुन्हा एकदा मोदींनी दाखवून दिलं. (टीका करणारे म्हणतील की भाजपनं पैसा ओतला. मग बाकीच्यांनी काय चिंचोके घेऊन प्रचार केला का? यांनी विविध जातीचे उमेदवार दिले. कोण देत नाही? EVM मध्ये घोळ केला. बहुधा ते दिल्ली, बिहार आणि आता पंजाबमध्ये करायचं विसरले) राजकारण्यांनीच लोकांची अशी मानसिकता केलीय. पैसा, जात यातच लोकांना अडकवून ठेवलं. त्यामुळं तोच निवडणुकीचा pattern होऊन बसला. मोदी या pattern पलीकडे घेऊन चाललेत. या वाटेत येणाऱ्या अनेक काट्यांना ते पुरून उरतायत. अर्थात so called विचारवंत लॉबीकडून फॅसिस्ट, हुकूमशहा वगैरे हिणवलं जातं. पण काही फरक पडत नाही. कारण ज्या लोकांचं देशासाठी dedication नाही त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही. तसंही जर जुनाट pattern बदलायचे असतील तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील. आता या निकालांमुळं ते अजून घेता येतील. जिथं सहज सरळ होत नाही तिथं सुतासारखं सरळ करावं लागतं. एक चांगलं झालं की चर्चा जातीपातीच्या पलीकडं गेल्या. लवकरच त्या मोदी विरोधापालिकडं जाव्यात हीच सदिच्छा. तूर्तास या गोष्टीचं श्रेय मोदींना दिलं पाहिजे. हे नैपुण्य बाकीच्यांनी आत्मसात केलं तर 'पप्पू' होण्याची वेळ येणार नाही. नरेंद्रांचं नैपुण्य वाखाणण्याजोगं आहे हे आता so called धर्मनिरपेक्षतावाद्यांनी सुद्धा मान्य करून किमान आज तरी खिलाडूवृत्ती दाखवावी.

By Sanket
मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है...

Thursday, 2 March 2017

पुरोगामीत्वाचे प्रतिगामित्व

आजकाल तुम्हाला so called पुरोगामी असण्यासाठी एक वाक्य येणं गरजेचं आहे. 'हा महाराष्ट्र शाहू,फुले,आंबेडकरांचा आहे'. एवढं म्हणलं की झाला तुम्ही पुरोगामी. हे वाक्य चुकीचं आहे असं नाही. पण अपूर्ण मात्र नक्कीच आहे. कारण हा महाराष्ट्र टिळक,सावरकर,गाडगेबाबा आणि अनेक इतर महापुरुषांचा सुद्धा आहे. कदाचित याचा राजकीय फायदा नसल्यामुळं पुढची नावं घेतली जात नाहीत. आणि नावं घेण्यापालिकडं जाऊ आपण. नुसती नावं घेऊन आपलं आचरण तृतीय दर्जाचं असलं तर काय उपयोग? या महापुरुषांनी दुसऱ्याला नावं ठेवता कार्य करण्यावर भर दिला. सध्या काही व्यक्ती फक्त नावं ठेवण्याचं काम करतात. कामाच्या नावानं चांगभलं. मग पुरोगामी म्हणवणारे असले टुकार लोक प्रतिगामी नव्हेत का? का फक्त एका वाक्यावरून आपण पुरोगामीची व्याख्या करणार आहोत? दुसऱ्याला शिव्या दिल्या की आपल्याला खूप अक्कल आहे असा समज अनेकांनी करून घेतला आहे. जर आपण महान लोकांच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करत असलो तरच आपण पुरोगामी आहोत. अन्यथा हा शब्द उच्चारण्याची आपली लायकी नाही. पुरोगामीत्व हे तुमच्या कामावर ठरतं. तुम्ही कोणत्या जाती-धर्माचे किंवा संघटनेचे समर्थक आहात त्यावरून नव्हे. जर तमाम पुरोगामींना असं वाटत नसेल तर आपण बुरखाधारी आहात असं माझं परखड मत आहे. पुरोगामीत्वाची प्रतिगामी वाटचाल रोखणे गरजेचे आहे. तरच आपण महापुरुषांचे खरे वारसदार होऊ.

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...