Friday, 28 June 2019

'कबीर सिंह'च्या निमित्तानं...



बरेच दिवस कोणता चित्रपट पाहिला नव्हता. रिपोर्ट चांगला आहे म्हणून मुद्दाम वेळ काढून 'कबीर सिंह' पाहिला. चित्रपट कसा आहे यावर अनेक मतमतांतरे असू शकतात. कथानक आणि कलाकृती म्हणून चित्रपट उत्तमच आहे. पण काही वेळा असं वाटतं की किती नकारात्मकता दाखवली आहे. पण या नकारात्मकतेतून आपण सकारात्मक काय घेऊ शकतो ते शोधून शेअर करावं वाटलं यासाठी हा खटाटोप. हा मसालापट असल्याने डोकं बाजूला ठेवूनच तो बघायचा असतो परंतु काही गोष्टींचं अनुकरण होऊ शकतं यासाठी यावर भाष्य करणं आवश्यक आहे. आधीच शौक म्हणून प्रचंड स्मोकिंग करणाऱ्या हिरोचं प्रेमप्रकरण फिस्कटल्यानंतर तो नशेच्या प्रचंड आहारी जातो. दारू, गांजा, ड्रग्ज इत्यादी इत्यादी. त्या सगळ्या प्रकारात जवळपास 2-3 वेळा तो मरणाच्या दारात जाऊन सुदैवाने परत येतो. बऱ्याचदा तो भरकटून कसाही वागलेला दाखवलं आहे. एखादी व्यसनी व्यक्ती 3 महिन्यात जेवढं नशापाणी करणार नाही तेवढं त्या 3 तासाच्या चित्रपटात केलं गेलं आहे. याचं कारण काय तर मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी.

आता थोडं चित्रपटातून बाहेर येऊ. आयुष्यात कित्येक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. सगळेच फासे आपल्याला हवे तसे पडतात असं नाही. आयुष्य म्हणलं की थोडं प्लस-मायनस व्हायचंच. पण याचा अर्थ असा नव्हे की त्या एखाद्या मनाविरुद्धच्या गोष्टीची शिक्षा संपूर्ण आयुष्याला द्यायची? आपल्या या नशापाण्याने लोकांच्या जाऊ दे, आपण स्वतःच्या उपयोगाचे देखील राहत नाही. यासाठी आपण मानसिकता बदलली तर अशा नशेच्या कुबड्या घेऊन आयुष्य जगण्याची वेळ येणार नाही. तसंही ज्याला आपण कुबड्या समजतो त्या आधार देण्याऐवजी खड्ड्यात घालत असतील तर या कुबड्या देखील कामाच्या नाहीत. चित्रपटाच्या सुरुवातीला एक जाहिरात पाहिली त्यात एका इसमाला सिगारेट घ्यायला पैसे आहेत पण सॅनिटरी नॅपकिनसाठी पैसे नाहीत. जीवाची काळजी घेणाऱ्या गोष्टीपेक्षा जीव धोक्यात घालणाऱ्या गोष्टी आपल्याला जवळच्या वाटत असतील तर ती आपली वैचारिक दिवाळखोरी नव्हे काय? अशा प्रकारच्या गोष्टींवर सातत्याने चर्चा करून कृती केली तरच काहीतरी सुधारणेची अपेक्षा बाळगता येईल. सकारात्मक गोष्टींची केवळ अपेक्षा करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे केव्हाही उत्तम. तसंही नशेची इतकी आवर्तनं करून समस्येचं निराकरण तर होतंच नाही. तथाकथित 'सुकून' वगैरे मिळतो, पण तो क्षणिक असतो.

अर्थात तो चित्रपट असल्यानं त्याचा शेवट गोड करणं ही अपरिहार्यता असू शकते. पण रोजच्या आयुष्यातील गोष्टींचा शेवट गोडच होईल याची कोणतीच खात्री देता येत नाही. शेवट गोड झालाच तर सोन्याहून पिवळं. पण एखादी गोष्ट नाही झाली गोड म्हणून काही सगळंच कडू होतं असं नाही. खरंतर ते किती कडू करून घ्यायचं ते आपल्यावर असतं. त्यामुळं 'कुछ मीठा हो जाए' असा दृष्टिकोन ठेवलेला कधीही चांगला. कोणी कसं वागायचं हा व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा असला तरी दोन चांगल्या गोष्टी सांगितल्या तर काही फरक पडत नाही. बाकी चित्रपट उत्तम आहे. फक्त नशे की चीजें सीखने से अच्छा है कुछ प्यार की चीजें सीखें। शायद कभी काम आएगा।😜

आणि गाणं म्हणजे सगळ्यात 'चेरी ऑन केक'...
दिल बनके मैं दिल धड़काउंगा,
मैं तेरा बन जाऊंगा...❤️

Tuesday, 11 June 2019

योद्धा 'युवराज'


भारतात राजेशाही नंतर लोकशाही आली असली तरी युवराजांची काही कमी नाही. त्यातले किती युवराज योद्धा आहेत हा खरंच चिंतनाचा विषय आहे. युवराज सिंग याला क्रिकेटचा वारसा वडिलांकडून मिळालेला असला तरी तो जहागिरी म्हणून कधी त्याने मिरवला नाही. त्याने नेहमी स्वतःच्या मेहनतीवर, कर्तृत्वावर आणि इच्छाशक्तीवर विश्वास ठेवला. मी माझ्या वडिलांची स्वप्नं नाही तर देशवासियांची स्वप्नं पूर्ण करायला आलोय या भावनेनं खेळ केला. असं असलं तरी युवराजने त्याचे वडील योगराज यांच्या स्वप्नांना खरं करून दाखवलं. पण हे सगळं करताना स्वतः संघर्ष केला. स्वतःच्या विक्रमासाठी नव्हे तर संघाला गरज आहे म्हणून खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये युवराजची गणना करता येईल.

मला आठवतं की रॉबिन सिंग हा अष्टपैलू कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असताना भारताला पुढचा अष्टपैलू कोण याची चिंता भेडसावत होती. त्यापूर्वी 2 वर्षे जगासोबतच भारतीय क्रिकेट मॅच फिक्सिंगने हादरून गेलं होतं. सौरव गांगुली नव्याने संघ बांधत होता. उपलब्ध गुणवत्ता योग्यप्रकारे हाताळण्याची कला गांगुली मध्ये असल्याने युवराजला देखील त्याचा लाभ झाला. युवराजची 2002च्या नेटवेस्ट ट्रॉफी मधील खेळी तर अविस्मरणीय होती. तेव्हाच त्याच्यातील योद्धा युवराज पहिल्यांदा मैदानावर दिसला होता. गांगुली आणि त्यानंतर धोनीने त्याच्यातील अष्टपैलू प्रतिभेला पुरेपूर वाव दिला. विकेट पडत नाहीये असं लक्षात आलं की प्रेक्षकांपासून अगदी कॅप्टनच्या नजरा युवराजच्या बॉलिंगकडे मोठ्या अपेक्षेने बघत असायच्या. 2007च्या टी-20 वर्ल्ड कपने त्याला सिक्सर किंग अशी ओळख मिळवून दिली असली तरी सिक्स मारावा तो युवराजनेच. अगदी सहज उचलेला शॉट आरामात सिक्स म्हणून जायचा ही तर त्याची अजून एक खासियत. 2011चा वर्ल्ड कप तर युवराजसोबत आपल्यासाठी सुद्धा अफलातून होता. त्याने प्रतिभेचा संपूर्ण कस लावून मॅच अक्षरशः खेचून आणल्या होत्या. युवराज त्याच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ अनुभवत होता. पण वर्ल्ड कप दरम्यान एका आजाराकडे त्याचं दुर्लक्ष झालं होतं. पण तरीही त्यानं सामन्यांना महत्त्व दिलं.

युवराज कडून क्रिकेट पलीकडं देखील खूप काही शिकण्यासारखं आहे. काल निवृत्तीची घोषणा करताना युवराज म्हणाला की घसरून खाली पडल्यावर माती झटकून उभं राहायला क्रिकेटनं शिकवलं. कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर असताना कॅन्सर सारख्या आजाराचं निदान होणं हा मोठा सेट बॅक होता. कॅन्सर झाला आहे हे पचवणंच खूप अवघड होतं. त्याच्या खेळानं आपल्याला आनंद दिलाच पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे त्याच्या कॅन्सर सोबतच्या संघर्षाने आजारासोबत झुंजणाऱ्या अनेकांना जगण्याची नवी उमेद दिली. त्याचं खेळाडू म्हणून जेवढं कर्तृत्व आहे त्याहीपेक्षा मोठं कर्तृत्व माणसातील योद्धा म्हणून आहे. आपल्याला एखादा आजार झालाय व आता आपण कसे बरे होणार या विचाराने कुठल्याही सामान्य व्यक्तीचे हातपाय गळतात. पण कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करून पुन्हा मैदान गाजवून मारण्याचे कर्तृत्व निश्चितच असामान्य आहे. त्याच्यातील मैदानावरील लढवय्या वृत्ती पेक्षा एक व्यक्ती म्हणून लढवय्या वृत्ती जास्त आहे. अर्थात पुन्हा मैदानात यशस्वी पुनरागमन करायचं या विचारानेच त्याला आजारासोबत संघर्ष करण्याची ताकद मिळाली हे नाकारून चालणार नाही.

काही लोकांना वाटतं की युवराजने निवृत्ती घ्यायला उशीर केला. पण मला वाटतं की कॅन्सर मधून सावरलेला युवराज सतत स्वतःच्या अपयशाला आव्हान देत राहिला. कॅन्सरवर मात करून आपण अजूनही पूर्वीसारखी खेळी करू शकतो यासाठी संधी शोधत राहिला. 'संघातून आता आम्ही काढण्याऐवजी तूच जा' हा संदेश मिळेपर्यंत खेळत राहणाऱ्या तथाकथित महान खेळाडूंपेक्षा युवराज कधीही चांगला. कारण तो केवळ स्वतःला आव्हान देत नव्हता तर त्याच्यावर अकाली कोसळलेल्या संकटाला आव्हान देत होता. त्याची ही वृत्ती केवळ खेळाडूंनाच नव्हे तर अगदी सर्वसामान्य माणसांना देखील प्रेरणा देणारी आहे. अर्थात युवराज बद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. हा युवराज केवळ धावांचाच नाही तर मनातलाही युवराज आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हा फक्त नावाचा किंवा कोणत्या घराण्याचा युवराज नसून आपल्या सगळ्यांचा खराखुरा युवराज आहे. कारण युवराजाने वारशाने नव्हे तर कर्तृत्वाने योद्धाच असावं लागतं हे त्यानं खरं करून दाखवलं.

फॉर 'युवी'

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...