Monday, 31 August 2020

सिटीझन मुखर्जी


भारतरत्न व माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विविध सरकारांमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची खाती भूषविली. खरंतर प्रणबदा कधी खासदार, मंत्री व राष्ट्रपती होते त्याबद्दल इंटरनेटवर माहिती सहज मिळेल. पण प्रणबदा भारतीय राजकारणात त्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडत होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना प्रथम संधी दिली आणि त्यांनी त्याचं सोनं देखील केलं. ते केवळ इंदिरा गांधींचे निष्ठावंत म्हणून नव्हे तर पक्षाच्या मूळ विचारधारेशी निष्ठावान राहिले. 'बिग फोर' पैकी संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ अशी तीन खाती त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या धोरणांबद्दल मतभिन्नता असू शकते पण ज्या पद्धतीने ते अनेक गोष्टी मांडायचे ते वाखाणण्यासारखे आहे. प्रणबदा लोकनेते नव्हते पण लोकहिताची जाणीव त्यांना होती. सरकार चालवताना आवश्यक कौशल्य त्यांच्यामध्ये होतं.

खरंतर इंदिरा गांधींच्या कार्यकाळातच प्रणबदा अर्थमंत्री बनले होते. पण त्यांना त्यापुरतंच सीमित ठेवण्यात आलं. 2004 साली सरकार स्थापन होत असताना पंतप्रधान पदावर त्यांचा नैसर्गिक हक्क होता. पण काँग्रेसला आदेशाचे पालन करणारी व्यक्ती हवी असल्याने प्रणबदांना संधी मिळू शकली नाही. अखेर त्यांनीच काळाची पावले ओळखून राष्ट्रपतीपदाची आपली उमेदवारी पक्की करून घेतली. पण त्यापूर्वी पक्षाने डावलून सुद्धा पूर्ण क्षमतेनं पक्षासाठी आपलं योगदान दिलं. युपीए-1 हा काँग्रेससाठी सुवर्णकाळ होता तर यूपीए-2 हा अत्यंत खडतर काळ होता. त्या खडतर काळात प्रणबदांनी संकटमोचकाची भूमिका पार पाडली होती. अन्य मंत्री पळ काढत असताना अथवा अडचणीत येत असताना एकटे प्रणबदा विरोधकांना सामोरे जात होते. भ्रष्टाचाराचे आरोप, अनागोंदी कारभार यामुळे सरकारची नाचक्की होत असताना अत्यंत कौशल्याने त्यांनी सरकारची बाजू लावून धरली होती.

प्रणबदा राष्ट्रपती असतानाच सत्तांतर होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण आपल्या पक्षाची व्यक्ती पंतप्रधानपदी नसताना देखील त्यांनी पूर्ण सहकार्य केले. नरेंद्र मोदी देशाच्या सरकारचे प्रमुख म्हणून नवीन असताना आवश्यक तिथे मार्गदर्शन देखील केलं. कोणताही भेदभाव केला नाही. प्रणबदा व नरेंद्र मोदी यांचं नातं गुरू शिष्याचं होतं. खुद्द नरेंद्र मोदी यांनीच याबद्दल सांगितलं होतं. दोघांनीही एकमेकांचं जाहीरपणे कौतुक केलं होतं. एकमेकांप्रती आदर व काळजी होती. मोदींच्या सातत्याने काम करण्याच्या सवयीवर 'थोडी विश्रांती घेत जा' अशा प्रकारचा प्रेमळ सल्ला दिला होता. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा वेळोवेळी त्यांचे आशीर्वाद घेतले. तो कालखंड आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणला तरी वावगं ठरणार नाही. त्यातून एका निकोप लोकशाहीचं दर्शन सर्वांना घडलं होतं.

काँग्रेसची खरी समस्या आहे की त्यांचा पक्ष पर्यायाने कार्यकर्ते हे कधीच घराण्याबाहेरच्या सक्षम व कर्तबगार नेत्यांना स्वीकारत नाहीत व प्रेमही देत नाहीत. त्यामुळे चांगल्या नेतृत्वाला काँग्रेस पक्ष मुकतो. आज काँग्रेसची वाताहत होण्याचे कारण कोणत्याही नेत्यांच्या आधी त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनाच एका घराण्याची हुजरेगिरी करण्यात धन्यता वाटते. प्रणबदा त्यांच्या पक्षाचेच इतके कर्तबगार नेते असताना देखील काँग्रेसच्या लोकांनी त्यांचं कधी खुल्या दिलानं कौतुक केलं नाही. एवढंच नाही तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने त्यांच्यावर तिखट शब्दांत टीका करण्यात काँग्रेसचे लोक अग्रेसर होते. अर्थात पदं देऊन नेत्यांचा अपमान करायचा ही देखील काँग्रेसची जुनी संस्कृती राहिली आहे. काँग्रेसजनांच्या या संकुचित मनोवृत्तीची खंत प्रणबदांना नेहमीच राहिली असेल. आज त्यांचं निधन झालं. किमान यापुढे तरी काँग्रेस समर्थकांनी त्यांच्या संकटमोचक असण्याची कृतज्ञता व्यक्त करावी. अर्थात हीच कृतज्ञता त्यांच्या हयातीत व्यक्त केली असती तर प्रणबदा भरून पावले असते. एक बरे झाले की मोदी सरकारने हीच कृतज्ञता वेळीच दाखवल्याने 'प्रणबदा' त्यांच्या हयातीत 'भारतरत्न' झाले. त्याचे श्रेय केवळ त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचेच. राष्ट्रपती असताना त्यांच्या ट्विटर हँडलचं 'प्रेसिडेंट मुखर्जी' असणारं नाव राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाल्यावर त्यांनी 'सिटीझन मुखर्जी' असं केलं होतं. मला वाटतं की हेच खरे प्रणबदा आहेत. सर्वोच्च शिखरावर असताना व त्यानंतर देखील आपल्याला 'सिटीझन मुखर्जी'च पाहायला मिळाले.

Wednesday, 5 August 2020

प्रयत्नांती 'प्रभू श्रीराम'


राम मंदिर. तमाम हिंदूंच्या आस्थेचा मुद्दा. काही लोकांचा युक्तिवाद असा की एवढा कसला मंदिराचा अट्टाहास. पण प्रभू रामचंद्र यांचे मंदिर त्यांच्या जन्मभूमीवरच होण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पूर्वीचं मंदिर पाडून त्यावर वादग्रस्त बांधकाम केलं गेलं यावर कोणी प्रश्न उपस्थित करत नाहीत. प्रॉब्लेम फक्त नव्याने बांधल्या जाणाऱ्या मंदिराबाबत. सर्व नागरिक सारखे आहेत आणि सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे. हॉस्पिटलच्या गमजा करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे जेव्हा विज्ञानाचे प्रयत्न संपतात तेव्हा कोणताही माणूस देवाचा धावा करतो. देवाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या माणसाचे सुद्धा हात कठीण प्रसंगात आपसूकच जोडले जातात. मग तो माणूस कोणत्याही धर्माचा असो. तुम्ही याबाबत टोकाचे आग्रही असाल तर द्या खुशाल स्वतःचं राहतं घर हॉस्पिटलसाठी खाली करून. दुसऱ्याच्या जागांवर आपल्या स्वप्नांच्या गमजा मारणं सगळ्यात सोपं असतं. 1992 पर्यंत या लोकांचा हॉस्पिटलचा आग्रह नव्हता हे विशेष. अर्थात हा दिवस इतिहास उगाळण्याचा नसून आठवणी जागवण्याचा आहे.

भाजपवर टीका होते की त्यांनी राम मंदिराचा मुद्दा तापवून सत्ता मिळवली. पण काही पक्षांनी इतर समुदायाचे तुष्टीकरण करून सत्ता मिळवली त्यावर कधीच कोणी बोलत नाही. भाजपच्या अजेंड्यावर असणारी एक एक गोष्ट आज सत्ता मिळाल्यावर मार्गी लागत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून नव्हे तर संविधानाच्या चौकटीत काम करून. जर भाजपला या सगळ्या गोष्टी लादायच्याच असत्या तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षाच केली नसती. पण संयमाने लढाई लढायची होती. कित्येक वर्षे सत्तेत असलेले पक्ष स्वतःच्या पक्षाच्या जन्मगावातील साधे नाले देखील साफ करू शकले नाहीयेत हे वास्तव आहे. त्यामुळे मंदिरावरून भाजपवर आगपाखड करणाऱ्यांनी भाजपला या गोष्टी कोणत्या कारणांमुळे साध्य होतात याचा अभ्यास केला पाहिजे. नेतृत्वाला ध्येयाची स्पष्टता, नेतृत्वाचा आदर (हुजरेगिरी नव्हे) करणारी पक्ष संघटना, तत्त्वांसाठी घरावर आयुष्यभरासाठी तुळशीपत्र ठेवणारे लोक, काम करतानाची समर्पित भावना, प्रसंगी पदरमोड करून कोणत्याही 'रिटर्न'ची अपेक्षा न ठेवता पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते अशा अनेक कारणांनी भाजपला या गोष्टी साध्य करता आल्या. भाजपचे नेतृत्व बदलले तरी अजेंडा कधीच बदलला नाही. कारण पक्ष व कार्यकर्ते त्या नेतृत्वापेक्षा विचारांनी बांधलेले आहेत. एवढी एक जरी गोष्ट बाकीच्यांना समजली तरी त्यांची राजकारणात प्रगती होण्याची शक्यता निर्माण होईल. पक्षाच्या अजेंड्यासाठी सत्तेला लाथ मारणारे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह असतील, गोळ्या छातीवर झेलून शरयू नदीच्या तीरावर आपले प्राण सोडणारे लोक असतील. अशा लोकांची फळी असल्यानेच हे सगळे शक्य झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद अशा अनेक संघटनांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. प्रत्येकाच्या योगदानाचा उल्लेख करायचा झला तर एक कादंबरी तरी सहज होईल. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून भूमिपूजन करण्यास उपस्थित होते.

1998 साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तेव्हा सुरुवातीला अनेकांना वाटलं की आता राम मंदिराचा मुद्दा मार्गी लागेल. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी असणाऱ्या काही घटक पक्षांनी त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी 370 कलम व राम मंदिर असे मुद्दे बाजूला ठेवायला लावले. सर्वांत मोठा पक्ष असल्याने नाइलाज झाला. पण 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वात पूर्ण बहुमताचं सरकार येणं, 2017 मध्ये उत्तर प्रदेशात प्रचंड जनमत मिळणं, वर्षानुवर्षे चालणारी खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे धोरण अशा अनेक गोष्टी जुळून आल्या. प्रयत्न वर्षानुवर्षे सुरूच होते. पण यावेळी नियतीनेच हा योग जुळवून आणला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. इतक्या सगळ्या लोकांच्या बलिदानापुढे, स्वप्नांपुढे, निकराच्या अविश्रांत लढ्यापुढे अखेर काळानेच न्याय केला. सगळ्या ज्ञात-अज्ञात लोकांचं यात श्रेय निश्चितच आहे. त्यांच्या योगदानामुळेच तर आजचा दिवस पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे.

आयुष्य सुंदर आहे फक्त सर्वच लोकांनी उत्साह आणि उन्माद यातला फरक लक्षात ठेवला पाहिजे. पूर्वजांनी पाहिलेल्या स्वप्नांनी, केलेल्या अपार कष्टांनी, छातीवर झेललेल्या गोळ्यांनी, लढलेल्या खटल्यांनी आज हा दिवस आपण सगळे पाहत आहोत. त्यामुळे यापुढे आपण सर्वांनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. प्रभू श्रीराम म्हणजे 'जग में सबसे उत्तम है, मर्यादा पुरुषोत्तम है' असं व्यक्तिमत्त्व. जय श्रीराम म्हणण्यासोबतच तसं वागताही आलं पाहिजे. भव्य मंदिर हे रामराज्य आणण्याचे अंतिम ध्येय नसून तो एक टप्पा आहे. कारण राम मंदिर हे प्रेरणास्थान आहे. बऱ्याचदा रामराज्य या शब्दाचा चुकीचा अर्थ लोकांमध्ये पसरवला जातो. रामराज्य म्हणजे सर्वत्र आनंद, सुजलाम सुफलाम देश, मनात रावण नसणारे लोक, अगदी 'सोने की चिडीया'च म्हणा ना. हे करणार कोण? आपणच सगळे, एक जबाबदार नागरिक म्हणून. राजा पुन्हा स्थानापन्न होणार मग प्रजेची जबाबदारी वाढलीच ना. साक्षात प्रभू श्रीरामांना देखील आधी 14 वर्षे वनवास, त्यानंतर त्यांच्या जन्मस्थानी मंदिर व्हायला सुमारे पाच शतके लागली. त्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. तेव्हा कुठे आज अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. रामराज्यासाठी तसेच प्रयत्न आपल्यालाही करावे लागतील. आपले प्रेरणास्थान असणाऱ्या या भव्य राम मंदिरात तर आपण जाऊच. पण मंदिरातून बाहेर येताना रामराज्यासाठी योगदान देण्याचे कोणते विचार बाहेर घेऊन येतो ते जास्त महत्त्वाचं असेल. अखेर 'प्रयत्नांती प्रभू श्रीराम' आहेतच की. आज त्यावर आणखी एक मोहोर उमटली.

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...