नाव वाचून विचित्र वाटलं ना. पण हे महाविकास आघाडी सरकारच विचित्र आहे. खरंतर 'बूँद से गई वो हौद से नही आती' असं म्हणलं जातं. पण यांच्या उलट्या कारभारानं सगळंच उलटं होत आहे. 'एमपीएससी'च्या परीक्षेचा घोळ हा त्याचाच एक जिवंत नमुना. तुम्ही पुन्हा तारखा द्याल, पण विद्यार्थ्यांच्या मनोबलाचं काय? कारण तब्बल एक वर्ष झालं हा सगळा घोळ सुरू आहे. विद्यार्थ्यांनी किती दिवस हे सगळं सहन करायचं? बाकी तुमच्या बैठका, अधिवेशनं, 'वशाटोत्सव'चं नियोजन हे सगळं सुरूच आहे. तुम्ही मागच्या दाराने विधिमंडळात गेला तसं सगळ्यांनाच जाता येत नाही. राज्यसेवेतील अधिकारी होऊ घातलेत हे विद्यार्थी. त्यांच्याच साथीने भविष्यात राज्य चालणार आहे. जे अभ्यास करत आहेत त्यांना तरी न्याय मिळू दे. बाकी लॉटरी म्हणजे काय त्याचा अनुभव अख्खं सरकार घेत आहेच. तुम्हांला एक घरात बसलेलं चालतं, पण बाकीच्यांची चूल घराबाहेर पडल्यावरच पेटते. मग त्यांना घरी बसून कसं चालेल?
या सगळ्याची सुरुवात कुठून झाली याचा आढावा घेऊया. अर्थात हे सगळं प्रसिद्ध झालेल्या नोटिफिकेशन्सच्या आधाराने मांडतोय. सर्वप्रथम 23 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारने 'एमपीएससी 2020' ची पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्याचं निश्चित केलं. दुर्दैवाने 'कोरोना'ची साथ आली त्यामुळे 22 मार्च 2020 रोजी पत्रक काढून परीक्षा 26 एप्रिल 2020 रोजी घेण्याचं निश्चित केलं गेलं. पण कोरोना'चा प्रसार वाढत असल्याने 7 एप्रिल 2020 रोजी पुन्हा एक पत्रक काढलं त्यानुसार ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. इथपर्यंत हे सगळं ठीक होतं. कारण कोरोनाचं नेमकं काय होणार हे त्यावेळी कोणालाही माहीत नव्हतं. सगळी मजा इथून पुढं केलीय.
1. दिनांक 17 जून 2020 रोजी पुन्हा एक प्रसिद्धीपत्रक आलं त्यात असं सांगितलं की 13 सप्टेंबर 2020 रोजी परीक्षा होईल.
2. परीक्षेला एक महिना शिल्लक असताना 12 ऑगस्ट 2020 रोजी असं सांगितलं की NEET परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी होत असल्याने पूर्व परीक्षा 13 ऐवजी 20 सप्टेंबर 2020 रोजी परीक्षा होईल.
3. पुन्हा 7 सप्टेंबर 2020 रोजी एका पत्रकाद्वारे परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी होईल असं सांगितलं. याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
4. एक दिवस बाकी असताना पुन्हा एक सरप्राईज दिलं. 10 ऑक्टोबर 2020 रोजी सांगितलं आता परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार नाही. नवीन तारीख यथावकाश जाहीर केली जाईल. यामध्ये राज्य शासनाने व सामान्य प्रशासन विभागाने आदेश दिल्याचं सांगितलं आहे.
5. दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी पुन्हा नवीन तारीख आली. 14 मार्च 2021 रोजी परीक्षा होईल असं सांगण्यात आलं.
6. 2 मार्च 2021 रोजी पत्रक काढून त्यात हॉल तिकीट बाबत सूचना देण्यात आल्या.
7. आता एक असं प्रसिद्धी पत्रक आलं की यावर हसावं की रडावं हे कळत नाहीये. 10 मार्च 2021 रोजी परीक्षार्थींसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. याचा अर्थ परीक्षा 14 मार्च रोजीच होणार यावर शिक्कामोर्तब झालं. शिवाय सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
8. आता कहानी में ट्विस्ट आला. 11 मार्च 2021 रोजी परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकली. यथावकाश तर 11 ऑक्टोबर 2020 च्या पत्रकात देखील लिहिण्यात आलं होतं.
गंमत बघा की जे लोक एक दिवस आधी उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध करतात त्यांना एका रात्रीत कोरोना विषाणू वाढत असल्याचा साक्षात्कार व्हावा? विशेष म्हणजे ही सूचना कधी सामान्य प्रशासन विभाग देतो तर कधी आपत्ती व्यवस्थापन विभाग. म्हणजे सगळीच धमाल आहे. सामान्य प्रशासन विभाग हा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अखत्यारीत येतो. आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अखत्यारीत येतो. आता तुम्ही एकमेकांकडे ढकला-ढकली करणार आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की तुमचे रोज नवीन येणारे कागद वाचायचे का? असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. जवळपास प्रत्येक प्रसिद्धी पत्रकात कोरोना विषाणूचा उल्लेख आहे. मग तयारी करायला वेळ किंवा मनुष्यबळ मिळाले नाही हा मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्ह मधील मुद्दा अत्यंत हास्यास्पद आहे.
हा सगळा घटनाक्रम बघितला तर लक्षात येईल की हे सरकार अक्षरशः पोत्याने चुका करत आहे. धोरणामध्ये प्रचंड धरसोड वृत्ती आहे. आत्तापर्यंत हे लोक आलं अंगावर, ढकल केंद्रावर या वृत्तीने वागत होते. मात्र आता दुसऱ्या विभागांवर देखील ढकलत आहे. तुम्ही वंशपरंपरागत मिळालेल्या पक्षाचं काहीही करा, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळू नका. तुम्ही लाख राजकीय घोडचूक करा, पण विद्यार्थ्यांना असं वेठीला धरू नका. तारीख जाहीर करू, उद्याच करू, एका आठवड्यातच परीक्षा घेऊ वगैरे सांगण्यासाठी केवळ फेसबुक लाइव्ह करणं हे केवळ बूँद-बूँद प्रयत्न आहेत. परीक्षा सांगितलेल्या वेळेला घेण्यासाठी ठोस काम केलं असतं तर हे सगळं करण्याची नामुष्कीच आली नसती. तुम्ही एवढं आभाळ फाडून ठेवलं आणि हातात सुई दोरा घेऊन आल्याचं कौतुक काय सांगता? हौद वाहून गेला आणि त्यात थेंब टाकून विद्यार्थ्यांना चुना लावू नका. 'हौद से गई वो बूँद से नही आती' इतकं एवढंही साधं कळत नसेल तर आपण आपली कार्यक्षमता किती रसातळाला नेली आहे याचा विचार केलेला बरा. कारण आपली कृती तर शून्यच असते.








